घरा-घरातून श्री समर्थांचे भव्य दिव्य विचार पोचवावे, समाजात समर्थांची विचारधारा रुजवावी, परत एकदा शिवराज्य-रामराज्य यावे, गर्तेकडे चाललेल्या भोगवादी चंगळवादी समाजाला सावरावे, समर्थांच्या वाणीत सांगायचे तर ‘शहाणे करून सोडावे बहुत जन!’ अशी समाजप्रबोधनाची आस मनी धरून कै.स.भ.द्वा. वा. केळकर तथा अप्पा व गीताताई केळकर यांनी "पत्रद्वारा दासबोध अभ्यास" हा उपक्रम सुरू केला. कितीतरी उपक्रम येतात व जातात, नंतर त्यांची आठवणही नसते . पण पत्रद्वारा दासबोध अभ्यास हा उपक्रम निरंतर राहिला व सातत्याने वाढला. साधारण १ लाख लोकांनी आजपावेतो हा अभ्यास केला आणि आज ही दरवर्षी हजारो विद्यार्थी ग्रंथराज दासबोधाचा अभ्यास करत आहेत. अप्पा नेहमी म्हणत, ‘ अनर्थकारी अर्थापासून हा उपक्रम दूर आहे.’ येथे कुणालाही मानधन नाही, पगार नाही. सर्व समीक्षक "सेवा" म्हणून काम करतात! श्री समर्थांची शिकवण त्रिकालाबाधित आहे. आज महाराष्ट्रातच नव्हे तर त्याबाहेर भारतात व परदेशातही हा अभ्यास पोचला आहे. आता इंटरनेटवरून आमची तरुण पिढीदेखील हा अभ्यास करते आहे. या उपक्रमाला तरुण नेतृत्वही लाभले आहे, ते नव्या नव्या कल्पना राबवत आहेत ही मोठी जमेची बाजू आहे..

अभ्यासक्रमाची रूपरेषा

१. पत्राद्वारे अभ्यास करायचा असल्यास दोन्ही बाजूंचा टपाल खर्च अभ्यासार्थीनी करावा लागतो. स्वाध्याय साधनात दिलेला ग्रंथराज दासबोध हेच मुख्य पुस्तक.

२. अभ्यासक्रम तीन वर्षांचा आहे(दासबोध प्रवेश, दासबोध परिचय, दासबोध प्रबोध). दर वर्षाच्या शेवटी प्रशस्तीपत्र दिले जाते. दासबोधात अध्यायाऐवाजी समास हा शब्द वापरलेला आहे. दहा समासांच्या संचाला दशक म्हणतात. असे वीस दशक म्हणजे २०० समास आहेत. पहिल्या वर्षी निवडक १२ समास, दुस-या वर्षी निवडक २६ समास, तिस-या वर्षी ३५ समास अभ्यासता येतात.

३. अभ्यास प्रश्नोत्तररूपी आहे. त्या त्या महिन्यातील समासाचे महिनाभर वाचन-मनन अपेक्षित आहे. (या वाचनाला सुमारे दहा मिनिटे पुरतात.)
अ) पत्रद्वारा : दरमहा एक स्वाध्याय फुलस्केपवर लिहून समीक्षकांकडे उत्तराच्या पोस्टेजसह पाठवायचा असतो.
आ) इमेलद्वारे : हस्तलिखित स्कॅन करून/ Microsoft Word मध्ये टाईप करून समीक्षकांकडे इ-मेलवर पाठवायचा असतो.

४. अभ्यासक्रमाची रचना माहीत असलेल्या विषयातून क्रमाक्रमाने नवीन संकल्पनाकडे जाणारी अशी केली आहे.

प्रवेश नोंदणीसाठी इथे क्लिक करावे

अभ्यासक्रमाचे शुल्क

प्रवेश, परिचय आणि प्रबोध असा हा तीन वर्षाचा, ३६ स्वाध्यायाचा अभ्यासक्रम असून तीनही वर्षाचे एकत्रित शुल्क रू. ३००/- इतके आहे. पहिला स्वाध्याय स्वीकारार्ह असल्यास अभ्यासक्रमाचे शुल्क भरून आपला अभ्यासार्थी क्रमांक/समीक्षक क्रमांक निश्चित करावा. आपल्या तीन वर्षाचा अभ्यासक्रमासाठी लागणारा ग्रंथ आणि साधन सामुग्री (स्वाध्याय-साधन) आपल्या पत्त्यावर पाठवली जाईल. हे स्वाध्याय साधन आपल्या तीनही वर्षाच्या अभ्यासासाठी लागणार आहे. त्यांचे मूल्य आपल्या अभ्यासक्रमाच्या शुल्कामध्ये समाविष्ट आहे.आपण अभ्यासक्रमाचे शुल्क भरल्यावर श्री सज्जनगडावरून श्री समर्थांचा प्रसाद आणि स्वाध्याय साधन आपण संकल्प पत्रावर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवण्यात येईल, पैसे भरल्यानंतर ३० दिवसांत स्वाध्याय साधन आपल्या पत्त्यावर न आल्यास या ८६६९४०५९७१ नंबरवर संपर्क साधावा.

उपक्रमाच्या शुल्काबाबत महत्वाचा खुलासा : उपक्रम शुल्कात समाविष्ट असलेले स्वाध्याय साधन हे केवळ अभ्यासार्थीसाठी आहे, त्यामुळे पहिला स्वाध्याय केंद्राकडे पोचल्यावरच ‘स्वाध्याय साधन’ आपल्याकडे रवाना होईल. स्वाध्याय न आल्यास भरलेले शुल्क ‘उपक्रमास देणगी’ म्हणून समर्थकार्यासाठी अर्पण होईल, कोणत्याही परिस्थितीत उपक्रम शुल्काचा परतावा मिळणार नाही.

प्रवेश प्रक्रिया

१. केंद्राकडे पहिला स्वाध्याय आणि उपक्रम शुल्क दोन्ही प्राप्त झाल्यावरच प्रवेश देण्यात येईल.

२. अभ्यासार्थीनी पहिला स्वाध्याय अगदी सावकाशपणे वाचून सोडवावा. पाच प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास सुमारे एक फुलस्केप कागद लागतो.

अ) पत्रद्वारा : सोबत पूर्ण माहिती लिहिलेले संकल्प पत्र (स्वत:ची साक्षरी करून)आणि पहिला स्वाध्याय आपण ज्या विभागात राहतो त्या विभाग केंद्र संचालकांकडे पोस्टाचे पाकिटातून पाठविणे आवश्यक आहे. सोबत स्वाध्याय साधन पावती क्रमांक नमूद करावा. संकल्प पत्र, पहिला स्वाध्याय आणि विभाग व केंद्र संचालकांचे पत्ते/संपर्क ‘डाउनलोड्स’ मधून घेता येईल. उत्तरासाठी स्वत:चा पत्ता लिहिलेले पोष्टाचे पाकीट पाठवावे. त्यातून आपणास पहिल्या स्वाध्यायाचे समीक्षण, काही पुढील अभ्यासासंबधी व्यावहारिक सूचना आणि यापुढील स्वाध्यास दरमहा ज्या समीक्षकाकडे पाठवायचे असतात त्यांचे नाव, पत्ता, संपर्कासाठी फोन नं. ही माहिती पाठवली जाईल.

आ) इ-मेलद्वारा : पहिला स्वाध्याय (PDF फॉरमॅटमध्ये) dasbodh.abhyas@gmail.com या इ-मेल आयडीवर इ-केंद्रसंचालकांना पाठवावा. पहिला स्वाध्याय ‘डाउनलोड्स’ मधून घेता येईल. मेलमध्ये स्वाध्याय साधन पावती क्रमांक नमूद करावा. आपणास पुढील अभ्यासासंबधी काही व्यावहारिक सूचना आणि यापुढील स्वाध्यास दरमहा ज्या समीक्षकाकडे पाठवायचे असतात त्यांचे नाव, इ-मेल आयडी, संपर्कासाठी फोन नं. ही माहिती पाठवली जाईल.

३. उपक्रम पत्रद्वारे / ईमेलद्वारे असल्याने वरील सर्व माहिती परिपूर्ण असणे महत्त्वाचे आहे. तसेच त्यातील बदल त्वरित कळविणेही आवश्यक आहे.

४. स्वाध्याय/संकल्प पत्रात कोणतीही त्रूटी असल्यास प्रवेश दिला जाणार नाही.

दासबोधाच्या अभ्यासाची निकड

आपण समाधानी आहात काय? माणसाचे खरे समाधान कशात आहे? आपल्या प्रयत्नांना दरवेळी यश येतेच कां? आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय काय आहे हे आपणास माहीत आहे काय? थोडे आत्मपरीक्षण केल्यास या सा-या प्रश्नांचे एकच उत्तर आढळते.

नाही...... नाही..... नाही...

“अस्थिरता, अनिश्चितता, असमाधान आणि भीती” अशीच सध्याची परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत काय केले पाहिजे आणि ते कसे करता येईल? याचा सर्वागीण विचार आणि शिकवण दासबोधात आहे. आपल्यात परिवर्तन घडवून आणण्याची ही एक सुवर्णसंधी आहे.

दासबोधाच्या अभ्यासातून काय साध्य होईल?

१. व्यक्तिगत विकास आणि स्वावलंबानाची सवय यामुळे परिस्थितीवर नियंत्रण करण्याची तुमची क्षमता वाढेल.

२. परस्परावलंबित्वाची योग्य जाण निर्माण करून सहकार्याची भावना वाढेल. इतर अनेकांच्या मदतीने परिस्थितीवर नियंत्रण करण्याची योग्य दिशा आपणास मिळेल.

३. योग्य तत्त्वज्ञानाची स्पष्ट दृष्टी आपल्याला मिळते. त्यातून नियंत्रणाच्या पलिकडे असलेल्या परिस्थितीला तोंड देण्याची क्षमता आपल्यात येईल.

श्रीमद् ग्रंथराज दासबोध अध्ययन (पत्रद्वारा आणि ईमेलद्वारा) हा अभ्यास प्रश्नोत्तररूपी आहे. त्यातून विचारांना योग्य दिशा मिळते. अभ्यासात सातत्य असल्याने विचारातून परिवर्तन होऊन दासबोधाचे अंतरंग उलगडत जाते. आध्यात्मिक संकल्पना स्पष्ट होतात. नरदेहाचे महत्व, मर्यादा आणि सार्थक कशात आहे हे कळते. देव ही काय कल्पना आहे आणि तो कसा शोधावा याचा मार्ग सापडतो. प्रपंच परमार्थस्वरूप होतो. जीवनाविषयी नवीन दृष्टी लाभून आत्मचिंतनाची सवय लागते. “आत्मिक विकासाबरोबर समाजाचा विकास” ही विचारधारा दृढ होऊ लागते.

दासबोधातील कित्येक ओव्या रोजच्या जीवनात नैराश्यप्रसंगी मानसिक आधार देऊन नवचैतन्य निर्माण करतात. अडचणीच्या प्रसंगी मार्गदर्शक होतात. मनातले संभ्रम दूर करतात. अनाठायी असलेल्या आसक्ती कमी करतात. योग्य व्यवहार लक्षात घेऊन तो आचरणात आणण्याचे बळ देतात. आत्मविश्वास वाढतो. साधेच पण निश्चित गुणकारी असेच हे औषध आहे असा अनेक अभ्यासार्थीना अनुभव आहे.